पुरोगामीत्व


शाहूंच्या भूमीत पडलेला रक्ताचा सडा बघूनही
कस घ्यायचं पुरोगामीत्वाच नाव ?
विवेकाची फाटकी गोंधडी पांघरून
किती दिवस आणायचा बुद्धिमत्तेचा आव?
किती युगे करायची शोकांकीकतेची हाव?

कफ़ल्लकतेची मर्यादा ओलांडणारे श्वास
झालेत यतीम
रक्ताळलेला देहही होतोय निर्मम
गुलामगिरीवर समाधानी आहेत बहुसंख्य स्वतंत्र जीव,
स्वतंत्र्याचा हावभाव करणारे,
त्याची काम म्हणजे
सडलेल्या फुलांची माळ शहिदांच्या तजबिरिसमोर ठेवायची
अन अश्रू गाळायचे
आणि तेवढंच केल तर
उद्याचा कालिदास
कौरवांची यशोगाथा लिहील
विवेकाचा पराभव इतिहास म्हणून सांगितला जाईल

स्वातंत्र्य म्हणजे सत्ताधीशांनी भिक म्हणून फेकलेली
पोळी नाही,
ते तर जन्माबरोबर आलेल जुळ आहे.
त्याच्यासाठी विनवणीची नाही
तर गरज आहे युद्धाची
वैचारिक युद्धाची,
म्हणूनच आता शोकाला काही अर्थ नाही
लढणाऱ्याने फक्त लढायचं
बुडायचं नाही कधी शोकात
शहिदांना सलाम करून
पुन्हा उतरायचं युद्धात
आता या शस्त्रांच्या वाराला वैचारिक बाणाने उत्तर द्यावे लागेल
कारण तो अमर आहे
क्षणिकतेचा शाप तर हिंसकांना आहे...

कॉम्रेड पानसरे, काळजी करु नका तुमचे विचार आम्ही नक्कीच पुढे नेऊ

कॉम्रेड पानसरे यांना माझ्या शब्दात भावपुर्ण श्रधांजलि ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Atheist having spiritual experience

It's not good bye.. It's see you later..

अनाज की चोरी