क्रांती

गर्जा जय जयकार क्रांतीचा
गर्जा जय जयकार
कुसुमाग्रजांच्या सुंदर ओळी ...
पण खरच कधी गरजला क्रांतीचा जयघोष ह्या भुमीत?
झाल्या त्या बर्‍याचश्या घोषणा व थोड्याश्या कृत्या उठावाच्या अन् बंडाच्या. वैज्ञानिक क्रांत्या झाल्या असतिलही पण राजसत्ता उलथुन टाकणार्‍या क्रांत्या कधी झाल्याच नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यासाठी केले गेलेले उठाव असो किंवा स्वातंत्र्योत्तर काळात झालेली असंतोषजनक आंदोलने मग ते जेपीपासुन ते अगदी आण्णा हजारेंपर्यंत असो ही क्रांतीच्या कोणत्याच परिभाषेत बसत नाहीत. कारण खर तर ह्या उठावामुळे किंवा आंदोलनामुळे कोणतीच राजसत्ता उद्वस्त झाली नाही ना नव्या राजसत्तेने, लोकसत्ते श्वास घेतला. स्वातंत्र्यपूर्व उठावामुळे ब्रिटीश राजवट संपुष्टात आली असली, लोकशाहीची बिजे रोवली गेली असतीलही पण नवीन राजवट, राजसत्ता किंबहुना तत्तकालीन बुद्धीजीवींना अभिप्रेत अशी व्यवस्था अस्तित्वात आली अस म्हणणे हे सुर्यास्तावेळी सुर्यनमस्कार करण्याइतक अतिउत्साहाच अन् तितकच बालिशपणाच ठरेल. केवळ एखादी व्यवस्था मोडुन काढण म्हणजे क्रांती नव्हे तर त्या व्यवस्थेला पर्यायी अन् तत्कालीन क्रांतीकारकांनी स्वप्नाळलेली व्यवस्था उभारणही तितकच किंबहुना त्याहुन अधिक महत्वाच असत. मग आता आपण भारताविषयी बघितल तर अजूनही अनेक असे कायदे अस्तित्वात आहेत जे ब्रिटीशांनी बनवलेत.अनेक अश्या कार्यकालीन पद्धती आहेत ज्या ब्रिटीशांनी सुरू केल्या होत्या (लादल्या गेल्या होत्या). अर्थात हे सर्व केवळ ब्रिटीशांनी बनवलेत म्ह्णुन कालबाह्य अनधिकृत किंवा बेकायदेशीर ठरवण हे निव्वळ अव्यवहारीक अन् विवेकशुन्य ठरेल. म्हणुनच योग्य त्या सुधारणांसाठी घटनाकारांनी कायदादुरुस्तीचा हक्क दिलाय पण तो वापरण्यात आला तो केवळ तात्पुरत्या राजकीय फायद्यासाठी अन् विशिष्ट लोकसमुदायाच्या (लोकसमुदाय??) तुटपुंज्या व क्षणिक लोभासाठी… क्षणिकतेला अमरत्वाच कवच कितीही थाटात बसवल तरी त्या क्षणिकतेला अमरत्व कधीच येत नाही. मग त्या क्षणिक लोभाचा का म्ह्णून इतका सोहोळा? भेकडांच्या जमावाकडुन क्रांती कधीच होत नाही कारण क्रांतीसाठी लागत ते उर फुटेपर्यंत लढण्याचा दृढनिश्चय आणि त्या संघर्षाच्या मागची वैचारीक बैठक. मग ती बैठक अन् ते पोलादी उर व त्यावर घाव झेलण्याची धमक आमच्याजवळ नाही का? आपल्याजवळही आहे लढायची दुर्दम्य ईच्छाशक्ती व विचारांचा महासागर. क्रांती तर होणारच कारण ती तर संतुलित परिवर्तनासाठी जन्माला आलेली रणरागिणी. मग ती कशीही असो रक्तरंजित वा मस्तिकभंजक. रक्ताच्या नद्या ओसांडुन वाहतिल नाही तर आसवांचे तळे ओसरतिल पण क्रांती ही निश्चित आहे. पण मोर नाचायला पावसाची गरज आहे.. पण इथ तर दुष्काळ आहे युगानुयुगे अन् पाऊस पडलाच तरी मोर मात्र असतात निद्रावश. आता प्रतिक्षा आहे त्यांच्या मिलनाची....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हम इंसान बन गये..

It's not good bye.. It's see you later..

Atheist having spiritual experience