शिवजयंती

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर,बहुजनप्रतिपालक, महाराजाधिराज योगिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो
महाराज मुजरा असावा,
आज सगळ्या ठिकाणी तुमचा जयजयकार असेल. खुप ठिकाणी मिरवणुकाही निघतील. प्रत्येकातला 'मर्द मराठा' आज जागा होईल. काहीजणांचा दुसर्‍या कोणत्यातरी तारखेला जागा होत असेल. असो, पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की फक्त आजच का?
कारण अहो राजे, आजचा हा तुमचा मावळा कुंभकर्णाचा अवतारच आहे. कुंभकर्ण निदान सहा महिने जागा तर होत होता पण तुमचा मावळा अजुन निद्रावशेतच आहे.. जागा झालाच तर तो केवळ एका वितीच्या पोटासाठी..तेही भरतो तो गुलामगिरीने... आता तुम्ही म्हणाल की ह्या राज्यात कोणताच हिरा नाही का? अहो राजे तुमच्या माझ्या ह्या राज्यात जन्माला येणारा प्रत्येक जीव हा हिराच आहे. पण काहीजण स्वःतलाच ठिकर्‍या मारुन घेतात आणि बाकीचे कोणत्यातरी कोळसाच्या खाणीत सडत पडतात. पण उरलेले हातावर मोजणारे हिरे हे राज्य उजळुन टाकत आहेत. पण बोटावर मोजणारेच? विचारात पडलात ना राजे? इतका मोठ्ठा इतिहास असुनही तुमचा मवाळा उदासिन कसा काय? अहो राजे पण तुमचा खरा इतिहासच आज जास्त लोकांना माहित नाही. तुम्हाला कोणी एका धर्माच्या खोलीत बंद केलय. त्या खोलीतही तुम्हाला एका जातीच्या फरशीवर अभिमानाने बसवल जातय.. आणि राजे आजकालचे राजकर्ते तर तुमचे पुतळे आणि राजकारण करण्यातच गुंतलेत.. अहो तुमचा इतिहास एका इयत्तीत सांगितला की विषय संपला... पण तुमचा दुरदृष्टीकोन, तुमच अर्थशात्र, तुमची धर्मनिरपेक्षता हे कोण सांगणार? तुम्ही केलेले वध हे दुष्ट व्यक्तिमत्वाचे होते, ते कोणत्याच जाती-धर्माचे नव्हते. हे कोण समजावणार? पण मग हे सगळ समजावल, सांगितल तर तुमचा क्षणिक स्वार्थी फायदा कसा होणार? इथले 'स्थानिक राजे' तुम्ही स्वाभिमानासाठी लाथाडलेल्या दिल्लीच्या तख्तापुढे मुजरा करतात. त्यावरुनच तुम्हाला तुमच्या 'जनतेची' स्थिती लक्षात येईल. त्या जनतेला तुम्ही गर्जना केलेली भाषाही नको झालीय क्षणभंगुर मोबदल्यासाठी...
राजे मग विचार येतो का साजरी करायची तुमची जयंती? आणि साजरी करण्याची नैतिकता आमच्यात आहे का? मला माहित आहे की तुमचा जीव तडफडत असेल. पण राजे उदास होऊ नका. श्रींच्या ईच्छेने तयार केलेल हे राज्य आहे. तुमच हे स्वराज्य पुन्हा नव्याने भरभराटीला येईल. कारण कितीही वार झाले, तरी अजुन तुमची सिंहगर्जना इथल्या दर्‍या-खोर्‍यात गरजतेय. मग पुन्हा उमटेल ब्रीद,'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा'. तुमची छाती पुन्हा गर्वाने फुगेल. पण त्यासाठी हवय फक्त निःपक्षपाती ऐकी, दुर्दम्य ईच्छाशक्ती. मग बघा कसा चकाकेल तुमचा हा हिरा? बस त्यासाठी हवाय तुमचा आणि आई भवानीचा आशिर्वाद. तो सदैव आहे पाठीशी माहीत आहे. तुमचा मावळा निदान आजच्या दिवशी तरी आत्मचिंतन करेल अशी आशा आहे.. तुमचे पुतळे आज सजवले जातील. पण त्याच वेळी तुमचा जीव ज्यांच्यात गुंतलेला आहे त्या किल्ल्यांकडेही लक्ष जाईल अशी अपेक्षा आहे.
आणि शेवटी माझ्याबरोबरच सर्व मावळ्यांमध्ये तुमच शौर्य जागवण्याची ईच्छा उमलू दे, बाहुत बळ आहे पण ते बाहु चालवण्याची दिशा मिळू दे येवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.... महाराज तत्पुर्ता निरोप घेतो. महाराज मुजरा असावा.....
एक मावळा- विवेक जाधव..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हम इंसान बन गये..

It's not good bye.. It's see you later..

Atheist having spiritual experience