शिवजयंती

माझा राजा हरला, होय माझा अजिक्य राजा हरला.. त्याला हरवल तुम्ही, मी सर्वांनी... परवा बाबासाहेबांना हरवल.. आज शिवाजी महाराजांना.. ‘मावळ्यांची’ ही कामगिरी पाहुन महाराजांना काय वाटत असेल ह्याचा विचार न केलेलाच बरा...
तुम्ही म्हणाल काय झाल मला अचानक?? आता रहावेना ओ... खरच हा आपला समाज हा असा समुदाय आहे ज्याला सवय आहे लाचारीची.. जमिनदाराची लाचारी, जमिनदार नसेल तर सत्ताधार्‍यांची आणि ते नसतील तर महापुरुषांच्या पुतळ्यांची, प्रतिमांची लाचारी... आणि हो त्या लाचारीत स्वाभिमानही असतो बर का.. आणि मग तो स्वाभिमान जयंती, पुण्यतिथी मधून दिसतो. शाळेत एकदा एकाने प्रश्न विचारला होता की आपण जयंती का साजरी करतो? तर शिक्षक म्हणाले की व्यक्तीच्या विचारांचा प्रसार व्हावा म्हणून आपण जयंती साजरी करतो... पण परवाची शिवजयंती बघितली आणि जयंती ह्या संकल्पनेवरचा विश्वासच उडला... शिवजयंती.. शिवजयंती हा चिंतनदिन आहे.. आत्मचिंतनाचा, सामाजिकचिंतनाचा... चिंतना त्या जानत्या राजाच, त्याच्या धोरणांच, विचारांच... पण नाही.. ही शिवजयंती अशी काही साजरी करण्यात आली की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी झाला नसुन इंग्लंडच्या राजघराण्यात झाला आहे.. काय तो डॉल्बीचा कर्कश आवाज, अवाढव्य बॅनर, अन् गाड्यांचा गोंगाट.. शेतकर्‍याची गंज पेटू नये म्हणून सुभेदारांना पत्र लिहुन काडी न पेटवण्याचा आदेश देणार्‍या दुरदृष्टीच्या, संवेदनशील राजाच्या राज्यात आज शेतकरी स्व:ता आगी जळतो, स्व:ताला जाळून घेतोय आणि आणि राज्यकर्ते काय करत आहे? तर ते महाराज्यांच्या प्रतिमेला हार घालण्यात व्यस्त आहेत... आणि आम्ही शिवजयंतीला डॉल्बीवर नाचण्यात.. ज्या राजाला भारतीय नौसेनेचा जनक म्हणतात आज त्याच्या राज्यात समुद्रमार्गाने दहशतवादी येतात आणि आपल्याला मारतात आणि राज्यकर्ते काय करतात? तर ते अरबी समुद्रात महाराजांचा ‘भव्य’ पुतळा बांधण्यात गुंग आहेत आणि आम्ही शिवजयंतीला गाड्यांच्या गोंगाटात...
मग तुम्ही म्हणाल की मग जयंत्या साजर्‍याच करायच्या नाहीत का? साजर्‍या करव्यात पण जयंती म्हणजे कुण्या सावकाराच्या मुलाच्या लग्नाचा सोहोळा नाही. ना कुण्या पुढार्‍याचा वाढदिवस.... मग पुन्हा तुम्ही म्हणाल की आपण आनंदही व्यक्त करु शकत नाही का? अहो कोणता आनंद? महाराजाच्या राज्यात शेतकरी आत्महत्या करतो (तुम्ही म्हणाल की प्रत्येक गोष्टीत हा विषय आणायची ‘फॅशनच’ आली आहे. पण हा राजा हा सर्वसामान्यांचा होता, शेतकर्‍याचा होता..) त्याचा का गरिबाच पोर भुकेने मरतय त्याचा? आणि तो आनंद व्यक्त करण्याचा अधिकार तरी आहे का आपल्याला? व्यक्तींना पुतळ्यात, प्रतिमेत बसवुन आम्ही तो गमावलाय.. (अर्थात तो मलाही नाही) खर तर आपण काय केलय माहीत आहे का? आपण एक घर बांधलय, त्याला दार, खिडक्या, कुलुप पद्धशीररीत्या लावुन घेतलय.. आणि प्रत्येक फरशीला वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिलेत. काहींना भगवा, काहींना निळा, काहींना हिरवा... घरात शिवाजी महाराजांची आणि बाकीच्या महामानवांच्या मुर्त्या बसवुन त्यांच्या पुढे दररोज फुल ठेवतो.. उदबत्ती दाखवतो... आणि मग झाल, आपण तयार केलेल फरश्यांच टोळक भांडायला मोकळ..
खरच आपल्याला राजे कधी कळलेच नाही.. वाहत्या नदीच छायाचित्र काढून त्याची वाह वाह करणार्‍या आम्हाला त्या नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो हेच अजून कळल नाही.. आणि ज्या दिवशी हे कळेल तोच दिवस असेल नवीन शिवजयंतीचा...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हम इंसान बन गये..

It's not good bye.. It's see you later..

Atheist having spiritual experience